संकल्प-संकल्पपूर्ती सोहळा करणारी एकमेव पतसंस्था

- … तर सहकारात आणखी चांगले वातावरण निर्माण होईल- एस. बी. पाटील
चिपळूण नागरीचा संकल्प मेळावा व सहकार कार्यशाळा
चिपळूण (प्रतिनिधी) : चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेने पारदर्शकपणे आर्थिक कारभार सांभाळत सभासदांमध्ये विश्वास निर्माण केला आहे. विशेष म्हणजे हा विश्वास सलग ३२ वर्ष टिकवून ठेवला आहे, यातच चिपळूण नागरीचे यश आहे. या संस्थेतर्फे दरवर्षी संकल्प मांडला जातो आणि तो संकल्प १०० टक्के पूर्ण देखील केला जातो. संकल्प व संकल्पपूर्तीचा सोहळा करणारी एकमेव चिपळूण नागरी पतसंस्था आहे. हीच परंपरा महाराष्ट्रामध्ये जर रुजली तर सर्व प्रकारच्या संस्था चांगल्या पद्धतीने काम करतील आणि सहकारात आणखी चांगले वातावरण निर्माण होईल, अशा शब्दात सेवानिवृत्त अप्पर आयुक्त तथा सहसचिव सहकार व पणन वस्त्रोद्योग मंत्रालय मुंबईचे एस. बी. पाटील यांनी चिपळूण नागरी आयोजित संकल्प मेळावा व सहकार कार्यशाळा प्रसंगी चिपळूण नागरीचे कौतुक करताना विश्वास व्यक्त केला.
हा संकल्प मेळावा व सहकार कार्यशाळा चिपळूण बहादूरशेखनाका येथील चिपळूण नागरीच्या ‘सहकार भवन’ सभागृहात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी पार पडला. यावेळी व्यासपीठावर व्हाईस चेअरमन अशोक साबळे, संचालक सूर्यकांत खेतले, अशोक कदम, मनोहर मोहिते, प्रकाश साळवी, प्रमोद साळवी सोमा गुडेकर, गुलाब सुर्वे, प्रकाश पत्की, संचालिका सौ. स्मिता चव्हाण, सत्यवान महामुनकर, श्रीमती नीलिमा जगताप, एडवोकेट नयना पवार, राजेंद्र पटवर्धन आदी उपस्थित होते.
चिपळूण नागरीतर्फे पुढील काळात आंबा व काजू बी खरेदीचा निर्णय- सुभाषराव चव्हाण
यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांनी आपल्या प्रास्ताविकात संस्थेच्या ३२ वर्षाच्या वाटचालीचा आढावा घेत असतांना संकल्प -संकल्पपूर्तीचा आढावा घेतला. हा मेळावा व सहकार कार्यशाळेपूर्वी दि. ६ व दि. ७ जून रोजी या दोन दिवसांच्या कालावधीत सुमारे नऊ कोटी रुपयांच्या ठेवी संकलित झाल्या आहेत. यामध्ये सर्व कार्यकर्ते, समाजसेवक, संस्थेचे कर्मचारी यांचे कौतुक करावे तेवढे कमी आहे, ते संस्थेला वाहून घेतल्यासारखे काम करीत आहेत, अशा शब्दात सुभाषराव चव्हाण यांनी या सर्वांच्या पाठीवर शाबासकीची थाप मारली. चिपळूण नागरीच्या माध्यमातून काम पाहत असताना वाशिष्ठी डेअरी प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना रोजगाराची संधी मिळाली आहे. शेतकरी दुग्ध व्यवसायाकडे वळत आहेत. ही चांगली बाब असून दुग्ध व्यवसायातून संपूर्ण कोकणात मोठं काम सुरू आहे. ते अधिक गतिमान होईल, अशा दृष्टीने आपण सगळ्यांचा सहभाग द्या, असे आवाहन केले.
ते आणखी पुढे म्हणाले की, सहकारातून समृद्धी, सहकारात व्यवस्थितपणे अर्थपुरवठा केला तर समृद्धी फार दूर नाही. ती समृद्धी साधण्यासाठी सहकाराशिवाय पर्याय नाही. सहकार हा एकमेकांच्या सहकार्याने पुढे जाण्याचे साधन आहे आणि ते अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी अशा पद्धतीने कार्यशाळा घेणे गरजेचे आहे. यातून एकमेकांच्या विचारांची देवाण-घेवाण होते आणि आपल्याला पुढे जाण्यासाठी प्रेरणा मिळते, असे सुभाषराव चव्हाण यांनी सहकाराविषयी आपली भूमिका स्पष्ट केली. संस्थेने शेतीपूरक दुग्ध व्यवसायासाठी चालना दिलेली असताना आता संस्थेच्या स्वयंरोजगार संस्थेच्या माध्यमातून काजू बी आणि आंबा खरेदी करण्याचा आम्ही पुढील काळात निर्णय घेतला असून यातून आंबा काजू बागायतदारांसाठी मार्केटची व्यवस्था होईल, असे सांगताना सहकारात कार्यक्षमता महत्त्वाची असल्याचे शेवटी स्पष्ट केले.
चिपळूण नागरीने शेतीपूरक दुग्ध व्यवसायासाठी कर्ज पुरवठा केल्याने दुग्ध व्यवसाय उभा राहतोय- प्रशांत यादव
वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाचे चेअरमन प्रशांत यादव यांनी आपल्या मनोगतात चिपळूण नागरीचा संकल्प दरवर्षी शिस्तबद्धतीमुळे यशस्वी होतो आहे. अचूकपणे काम करून घेण्यासाठी जे सातत्य लागते, ते सातत्य राखण्यामध्ये संस्था आणि संस्थेचे सगळे कर्मचारी आणि आपण सगळे सभासद त्यामध्ये हातभार लावणारे कधीही कमी पडत नाहीत, म्हणूनच या संस्थेचा आज वटवृक्ष झाला आहे. संस्थेने अवघ्या दोन दिवसात सुमारे नऊ कोटींच्या ठेवी संकलित केल्या आहेत, ही बाब खरोखरच कौतुकास्पद आहे. ही संस्था दोन चार दिवसात आठ- आठ कोटीच्या ठेवी कशी वाढवते, याचे उदाहरण आपल्याला एक प्रतिक्रिया आजच सकाळी व्हाट्सअपवर आली आहे. यावरून लक्षात येते, ते म्हणजे रत्नागिरी निवळी येथे झालेल्या अपघाताविषयी माहिती मिळताच आपल्या चिपळूण नागरी व वाशिष्ठी परिवाराने सहवेदनेच्या जाणिवेतून अपघात झालेल्या शिक्षकांविषयी आपुलकीने चौकशी केली. सहाय्य केले. अपघाताचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासकीय यंत्रणेला वेळीच अवगत केल्याने अपघातग्रस्तांना वेळीच मदत मिळाली. याबद्दल संपूर्ण टीमला मनःपूर्वक धन्यवाद असे एका शिक्षक संघटनेने पाठवले असल्याचे सांगून चिपळूण नागरी व संचालक मंडळाने केलेल्या या सहकार्याची बोलकी प्रतिक्रिया आहे. कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून असो किंवा या परिवाराने लोकांच्या आणि जनमानसांच्या मनात जे आदरपूर्वक स्थान निर्माण केले आहे. म्हणूनच चिपळूण नागरी पतसंस्था महाराष्ट्रात अग्रस्थानी आहे, अशा शब्दात चिपळूण नागरीचे प्रशांत यादव यांनी कौतुक केले.
प्रशांत यादव यांनी आपल्या पुढील मनोगतात वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाच्या वाटचालीचा आढावा घेताना चिपळूण नागरीने शेतीपूरक दुग्ध व्यवसायासाठी कर्ज पुरवठा केला. यातूनच दुग्ध व्यवसाय उभा राहतो आहे. चिपळूण पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागाने केलेल्या सर्वेक्षणानुसार गाई -म्हशींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ही जनावरे खरेदी करण्यासाठी चिपळूण नागरीने सुमारे ८० टक्के कर्ज पुरवठा केला आहे. याचबरोबर कोंबड्यांची संख्या ६१ हजारांवर पोहोचली असल्याचे समोर येत असल्याने शेतकरी शेतीपूरक दुग्ध व्यवसाय व पोल्ट्री व्यवसायाकडे वळत आहे. संगमेश्वर- देवरुखमध्ये पोल्ट्री व्यवसायासाठी पोषक वातावरण आहे. तिथे काम केल्यास संगमेश्वर- देवरुख ग्रामीण भागातील चित्र बदलल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास श्री. यादव यांनी यावेळी व्यक्त केला. तर बँकांकडून शेतकऱ्यांना सहकार्य मिळत नसल्याची खंत व्यक्त केली.
वाशिष्ठी डेअरी प्रकल्प कोकणासाठी वरदान- सौ. स्वप्ना यादव
मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. स्वप्ना यादव यांनी आपल्या मनोगतात चिपळूण नागरीच्या वाटचालीचा आढावा घेताना संस्थेच्या संकल्प व संकल्पपूर्तीसाठी मेहनत घेत असलेल्या कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. महिला बचत गटांनी संस्थेच्या पुढाकाराने आपले छोटे छोटे व्यवसाय उभारावेत, असे आवाहन केले. तर वाशिष्ठी डेअरी प्रकल्प कोकणासाठी वरदान ठरत असल्याचे मत व्यक्त केले.
यावेळी योगेश चव्हाण, रवींद्र सागवेकर, अजित निकम, शांताराम नवेले, ज्येष्ठ पत्रकार सतीश कदम आदींनी आपल्या मनोगतात चिपळूण नागरी पतसंस्थेने केलेल्या सहकार्याची आठवण करून देताना जनमानसात संस्थेने केलेले काम अढळस्थानी राहिले आहे. त्याचबरोबर वाशिष्ठी डेअरी प्रकल्पामुळे रोजगाराची संधी मिळाली असल्याची भावना व्यक्त केली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल टाकळे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली तर मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. स्वप्ना यादव यांच्या मार्गदर्शनाखाली अन्य अधिकारी व कर्मचारी वर्गाने मेहनत घेतली.